‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ३ हजार रुपये वाढविणार

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे वितरण’ झाले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, वनामतीचे प्रभारी संचालक रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘पीएम किसान सन्मान योजनेचा ‘ १९ वा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम
• प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात ‘पीएम किसान सन्मान निधीचे’ २२ हजार कोटी वितरीत
• पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र शासनातर्फे वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ६ हजार रुपये वितरण
• तर राज्य शासनाच्या वतीने ‘नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे’ शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत
• आता राज्य शासन या निधीत ३ हजार रुपयांनी वाढ करणार, एकूण १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार
• केंद्र शासनाकडून ‘बळीराजा जलसंजीवनी योजना’ मंजूर करून विदर्भातील ८९ सिंचन प्रकल्प पूर्ण
• नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा व विदर्भातील उर्वरित भागात अंमलबजावणी करणार
• शेतकरी उत्पादक गटांना रोजगारक्षम कृषी प्रक्रिया उद्योग, ग्रेडींग व्यवस्था आदी समग्र सुविधा पुरवणारी ‘स्मार्ट योजना’ आणली
• अॅग्रीस्टॅकद्वारे संपूर्ण शेतीचे डिजीटायजेशन करून प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक लाभ देणार
• राज्यात आतापर्यंत अॅग्रीस्टॅक अंतर्गत ५४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी
• येत्या ५ वर्षात शेतकऱ्यांकडून वीज बिल न घेण्याचा निर्णय
• मागेल त्याला सौरपंप योजना सुरू असून मागील १ वर्षात १ लाख शेतकऱ्यांना याअंतर्गत सौरपंप वितरण