बीड जिल्ह्यातील १३ सरपंच अन् ४१८ ग्रामपंचायत सदस्य अपात्र..अपात्र जागांबाबत पुढे काय? पोटनिवडणुका की …..?
बीड जिल्ह्यातील १३ सरपंच अन् ४१८ ग्रामपंचायत सदस्य अपात्र..अपात्र जागांबाबत पुढे काय? पोटनिवडणुका की …..?
ग्रामपंचायत निवडणूक लढताना शपथपत्र देऊन जात वैधता प्रमाणपत्र देऊ असं म्हटलेल्या ज्या सदस्यांनी अन्जा सरपंचांनी अद्याप प्रमाणपत्र दाखल केलेले नाही अशा सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सदस्यत्व रद्द केले आहे.
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील १३ सरपंच तर 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलेत. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांका पासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचाचे सदस्य रद्द केले आहे.
यापूर्वीही झाली होती अशीच कारवाई
या आधीही अशीच कारवाई झालेली होती. त्यावेळी राज्य सरकारकडून कार्यकाळ वाढवून देण्यात आलेला होता. ज्यामध्ये बऱ्याच सरपंच अन् सदस्यांनी प्रमाणपत्रे सादर केली होती. यामुळे पोट निवडणुका त्या त्या गावात टळल्या होत्या. कालावधी यावेळीही वाढवून मिळतो का? या कडे अपात्र सदस्य अन् गावगड्यातील राजकारण्यांचे लक्ष असणार आहे..
बीड जिल्ह्यातील या सरपंचांचा आहे समावेश…
बीड तालुक्यातील एकही सरपंचांच्या अपत्रतेची कारवाई झालेली नाही. यामध्ये धारूर तालुक्यातील घागरवाहाचे सरंपच गोपाल मारोती वेताळ, पांगरीचे सरपंच सुनिता कालिदास डोंगरे, कोळपिंपनीचे सरपंच अशोक अर्जुनराव यादव, मैदवाडीचे सरपंच आकाश बंडू गरने गांजपूरचे सरपंच कस्तुराबाई साला पवार, माजलगांव तालुक्यातील खरात आडगांवचे सरपंच अनुसया मधुकर आढाव, नागडगांवचे सरंपच सरस्वती भास्कर जाधव, फुलेपिंपळगावचे सरपंच चंद्रकांत सिताराम धोंगडे, शिंदेवाडीचे सरपंच शेषेकला प्रकाश वाघमारे, पाचेगांवचे सरपंच विमल मधुकर थोरात, चिंचोलीनाथ रोहिणी मारोती सांगळे, कोपराचे सरंपच शारदा लाला भारती, तडोळाचे सरपंच ज्ञानेश्वरी विष्णू कांबळे या १३ सरंपचाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.