सोयाबीन खरेदी ही हमीभाव देत नाफेड कडून सुरू आहे. मात्र या खरेदीत बारदाना नसणे, तांत्रिक अडचणी, सुट्ट्या यांमुळे बहुतांश शेतकऱ्यांची खरेदी झाली नाही. बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सोयाबीन खरेदी अद्याप मोठ्या प्रमाणात बाकी आहे. याबाबत वारंवार शेतकऱ्यांकडून तारीख वाढविण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. ३१ जानेवारी शेवटची तारीख असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रावर रांगा लागलेल्या असून शेतकऱ्यांना कित्येक तास ते दिवस वेटींग वर थांबावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून खरेदी वेळ वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.
राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने सुरु असून 31 जानेवारीनंतरही सोयाबीनची खरेदी चालू राहावी, अशी मागणी होत आहे. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी सात दिवस मुदतवाढ मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
लातूर जिल्ह्याचे खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाले असून शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची वाढीव उद्दिष्ट देण्याची मागणी लक्षात घेता लातूर जिल्ह्यासाठी आता 20 हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीच्या वाढीव उद्दिष्टालाही मंजुरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यासाठी दहा हजार मेट्रिक टनाचे वाढीव उद्दिष्ट मंजूर करण्यात आले होते.