सीसीआय खरेदी बंद असल्याने कापसाच्या भावात क्विंटलमागे पाचशे रुपयांनी शेतकऱ्यांचे नुकसान
लवकरात लवकर बंद पडलेले सीसीआय सॉफ्टवेअर दुरुस्त व्हावे – संचालक धनंजय गुंदेकर

प्रमुख मुद्दे
∆ राज्यात सीसीआय कडून १ कोटी ३८ लाख क्विंटल कापूस खरेदी
∆ कृषी उत्पन्न बाजार समिती बीड अंतर्गत ६२ हजार ६२९.४५ क्विंटल खरेदी
∆ तब्बल ८ दिवसांपेक्षा अधिक काळापासून खरेदी बंद
∆ बऱ्याच केंद्रावर कापूस भरून आणलेली वाहने उभी
∆ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय

बीड (प्रतिनिधी) : ‘सीसीआय’च्या स्वॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण सांगून गेल्या आठवड्यापासून सर्वत्र ‘सीसीआय’ची कापूस खरेदी बंद झाल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून क्विंटलमागे ५०० रुपये कमी दराने खालगी बाजारपेठेत कापूस विकावा लागत आहे असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती बीड संचालक धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे. ही तांत्रिक बिघाड दुरुस्त कधी होणार याबाबत अद्याप ‘सीसीआय’ने कोणताही खुलासा केलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आधीच सोयाबीन खरेदी ही अर्धवट शेतकऱ्यांची झालेली असताना त्यात भर असता सीसीआयने घालत शेतकऱ्यांवर अन्याय सुरू केला आहे.
कापसाची विक्री, चुकारे व अन्य आवश्यक तपशिलासंदर्भात सर्व माहिती याच स्वॉफ्टवेअरद्वारे केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या स्वॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रावर कापसाने भरलेली वाहने घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला. केंद्र सरकारच्या भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यावर्षी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाला उपअभिकर्ता म्हणून करार दिला नाही. त्यामुळे ‘सीसीआय’ सर्वत्र स्वत: कापूस खरेदी करत आहेत. गेल्या आठवड्यापासून मराठवाडा विदर्भासह सर्वत्र सुरू असलेली ‘सीसीआय’ची कापूस खरेदी बंद आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी केंद्राने ७५२१ रुपये असा कापसाला प्रति क्विंटल दर हमीभावानुसार निश्चित केला आहे. मराठवाड्यातील विशेषतः बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र ७४२१ असा दर शेतकऱ्यांना मिळत होता. इतर भागापेक्षा कमी दर मिळण्याचे कारण हे आखूड धागा हे सांगितले जात होते. तथापि अचानक ‘सीसीआय’ची खरेदी बंद झाल्याने कापसाचे दर किमान ५०० रुपयाने घसरले आहेत. खासगी बाजारात सध्या ६९०० रुपये दराने कापसाची खरेदी केली जात आहे. सर्वत्रच शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. कापसाचे दर वाढतील म्हणून शेतकरी गेल्या काही वर्षात हंगामाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत कापूस साठवून ठेवतात. त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे.
राज्यात एकूण ३ कोटी ६ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यातली ‘सीसीआय’ने १ कोटी ३८ लाख क्विंटल खरेदी केलेली आहे. यामध्ये बीड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ६२ हजार ६२९.४५ क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे. बाजारात ‘सीसीआय’ची खरेदी चालू होती तेव्हा खासगी दरही व्यवस्थित होते, पण ‘सीसीआय’ची खरेदी बंद झाल्याने आता सारी मदार खासगी खरेदीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे खासगी खरेदीचे दर घसरले. दरम्यान स्वॉफ्टवेअरमध्ये असलेली ही तांत्रिक बिघाड दुरुस्त कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ती लवकरात लवकर व्हावी असं संचालक धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे.
प्रमुख मुद्दे
∆ राज्यात सीसीआय कडून १ कोटी ३८ लाख क्विंटल कापूस खरेदी
∆ कृषी उत्पन्न बाजार समिती बीड अंतर्गत ६२ हजार ६२९.४५ क्विंटल खरेदी
∆ तब्बल ८ दिवसांपेक्षा अधिक काळापासून खरेदी बंद
∆ बऱ्याच केंद्रावर कापूस भरून आणलेली वाहने उभी
∆ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय